Friday, August 27, 2010

श्लोक ३५

II श्रीराम समर्थ II

असे हो जया अंतरी भाव जैसा |
वसे हो तयां अंतरी देव तैसा ||
अनान्यास रक्शितासे चापपाणि|
नुपेक्षी  कदा रामादासाभिमानी ||३५||

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण !

जय जय रघुवीर समर्थ !

5 comments:

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate ( Gwaliar ) ....

रहेगा अंत:करण में भाव जैसा|
वसेगा प्रभु भी ह्रदय में ही वैसा||
भक्तों की रक्षा करते चापपाणि[धनुर्धारी]|
उपेक्षा ना करते कभी दासाभिमानी||

अर्थ..... श्री समर्थ रामदासजी कहते है कि हे मानव मन ! प्रत्यैक व्यक्ति के मन में उसके अपने भाव या विचार होते है| अत: जिस मानव के मन में जैसी भावना होती है , परमेश्वर भी उसके मन में वैसा ही वास करता है| धनुर्धारी श्रीरामचन्द्रजी ऐसे भक्त की जो देह के प्रति अर्थात् शरीर से मोह नही रखता हो , अभिमान नही करता हो उसकी रक्षा करते रहते है| उसकी उपेक्षा कदापि नही कर सकते| अत: हे मानव ऐसे क्रुपालु परमेश्वर का तु दास बनकर अपना जीवन सार्थक कर| अर्थात् जैसा मन में भाव होगा प्रभु भी वैसे ही अपने को प्राप्त होगें| इसलिये अपना मन, कर्म , विचार आचार शुध्द रखना चाहिये|........

suvarna lele said...

जसा भाव आपल्या मनात असतो त्याप्रमाणे आपल्याला देव तसा भासतो ।जसा भाव तसा देव ! परमेश्वराच्या रूपाची जशी कल्पना केली जाते तसे रूप आपल्या समोर दिसते ।कारण आपल्या मन बुध्दीवर त्याचाच अमल असतो । मनात येइल् ती कल्पना करण्यापेक्षा काहीतरी पौराणिक आधाराने ती कल्पना केलेली छान असते ।ती कल्पना सुध्दा विवेक पूर्ण असायला हवी कारण सामर्थ् म्हणतात :विवेके वीण जो भाव तो अभाव । मनाला आनन्द देणारे रूप मन एकाग्र करते ।त्या मूर्ती वर स्थिरावते ।त्या परमेश्वर् रूपाबद्दल भक्ती उत्पन्न व्हायला मदत होते ।जसे रूप आपल्या भावने प्रमाणे आपल्याला दिसते तसा आपला भाव जसा असतो तसे नाते ईश्वराशी तयार होते ।आपले भक्त ईश्वर् ,बन्धू ,माता ,पिता ,सखा अशी अनेक प्रकारची नाती तयार होतात ।आपला तसा भाव असावा लागतो ।अर्जुनाने श्रीकृष्णा बरोबर सख्यत्वाचे नाते जोपासले ।द्रौपदी त्याला बन्धू मानत होती ।देवकी त्याच्यावर पुत्रा प्रमाणे प्रेम करत होती ।असा सर्व जगाला व्यापणारा हा परमेश्वर् भक्तानी ठेवलेल्या भावाप्रमाणे प्रत्येकाला दिसला ।तसाच तो आपल्यालाही दिसेल ।फक्त एक गोष्ट हवी ।त्याच्याशी अनन्यता ! अनन्यता म्हणजे न अन्य असा भाव ।भक्त जेव्हा स्वत ;ला ईश्वरा पासून वेगळे मानत नाही ,तेव्हा तो अनन्य होतो ।भक्त मानतो की परमेश्वराची ईच्छा तीच त्याची ईच्छा ! तो कोणतीही गोष्ट करत नाही ।परमेश्वर् त्याच्या कडून करवून घेतो आहे ।परमेश्वरच त्याच्या कडून होणा-या गोष्टींचा कर्ता आहे ।अशा भक्ताची श्रीराम उपेक्षा करत नाहीत ।

Gandhali said...

श्लोक ३५
हे मना ! हा माझा प्रभुराम पतितपावन आहे,दीनानाथ आहे ,शूर सामर्थ्यशाली आहे आणि तो त्यावर दृढ विश्वास ठेवणाऱ्या भक्तांची नेहमी काळजी वाहतो हे सतत बजाविले आहे.पण बाबारे, ती केवळ पेरणीसाठीची जमिनीची नांगरणी होती पण खरा गाभा,खरे बीज या श्लोकात समर्थ पेरतात. अतिशय महत्वाचा हा श्लोक आहे जणू pre primary नंतर पहिलीत जाण्यासाठीची Entrance आहे.
'योगक्षेमं वहाम्यहम' ही भगवंताची प्रतिज्ञा आपण पाठ करतो पण हा श्लोकाचा चवथा चरण आहे आणि पहिल्या तीन चरणात मी कोणाचा योगक्षेम वाहतो हे स्पष्टपणे सांगितले आहे.जो ईश्वराचे अनन्यभावाने चिंतन करतो,सर्व प्रकारे सेवा करतो आणि ज्याचे अंत:कारण ईश्वराशी निरंतर संलग्न असते त्यांचा भार ईश्वर नक्की शिरी घेतो असे गीतेत सांगितले आहे.
देवाचे सतत काही तरी करणारे आपण खुपजण पाहतो पण त्या मागचा भाव महत्वाचा . प्रथा म्हणून , कोणीतरी सांगितले म्हणून , निवांत वेळ आहे म्हणून ,प्रसन्न वाटते म्हणून , काहीतरी हवे म्हणून फलश्रुती पाहून स्तोत्रे,व्रते पोथी-पारायणे करणे हे सगळे आपण स्वतः करतो अन करणारे अनेकजण पहातो हे सर्व प्राथमिक तयारी म्हणून ठीक,एक वळण म्हणून दैनंदिन उपासनेची गरज आहेच.समर्थ स्पष्ट सांगतात "सगुणाचे नी आधारे I निर्गुण पाविजे निर्धारे ...II " पण त्यातच गुंतून राहणारे अनेकजण असतात आणि हे परमार्थाच्या मुलभूत उद्देशाच्या दृष्टीने पुरेसे नाही हे सतत लक्षात ठेवून भावाला ,निष्ठेला, त्यागाला आणि सातत्याला जपले पाहिजे. देव भावाचा भुकेला....भावनेने जसे नाते जोडतो तसा देव बनतो पिता म्हणा तो पिता बनतो,माता म्हणा आई बनतो ,बंधू होतो ,मित्र होतो , मालक होतो, मुल होतो जे म्हणाल ते होतो ,जे मानाल ते वाटतो.
त्याचे ठिकाणी लहान-थोर, गरीब-श्रीमंत हा भेद नाही.तुम्ही पुजेत त्याला कुठले उपचार अर्पण करता हे तो पाहत नाही . तो फक्त प्रेमाचा भुकेला असतो.
" सदा सर्वदा देव दासाभिमानी I कृपा भाकिता शीघ्र पावे निदानी I
तया अंतरी थोर लहान नाही I परी पाहिजे दृढ भावार्थ काही II "
' भावेन देवः ' भाव हवाच तसाच देव होईल हे खरे , पण हा भाव 'अनन्य हवा'. अनन्य म्हणजे एकत्व ' तोच एक सर्व ' आपले मन देवाला अर्पावे ते सुद्धा लोण्यासारखे मृदू बनवून म्हणजे त्यावर कुठल्या ही इच्छा ,वासना,संस्कार यांची पुटे नसावीत .
" म्हणुनी नाशिवंत तितुका मळ I तुवां त्यजावा अमंगळ I
तो गेलीया तूच सकळ I आहेस बापा II "
ही परमात्म्याची अनन्यता साधणे सहज असते. केवळ आपल्या अज्ञानामुळे ते आपल्याला कळत नाही. भक्ती जशी जशी तीव्र होईल,उत्कट होईल तशी तशी अनन्यता अनुभवास येते आणि अशा अनन्यभक्ताचे रक्षण धनुर्धारी राम सर्व प्रकारे करतो . राम भावाचा भुकेला... त्याची भूक प्रेमाच्या नैवेद्याने शमते . तो नैवेद्य अर्पण करणे हे भक्ताचे काम.....
" भावबळे जे ही धरिला अंतरी I तया क्षणभरी विसंभेना II "
II जय जय रघुवीर समर्थ II

Gandhali said...

II श्रीराम II
भक्ती उत्कट झाली,अनन्यता साधली की कसा अनुभव येतो हे समर्थांनी केलेले वर्णन सांगण्याचा मोह आवरत नाही.
समर्थ म्हणतात ,
" भक्ताला काय उणे रे I देव त्रैलोक्य वर्तवी I
तो देव आपुला झाला I वैभवा कोण पुसते II
टाकिता लावितो मागे I देव दाता चि जाहला I
घ्यावे ते कोणते किती I त्रैलोक्य भरले असे II
आपण सर्व देवाचा I देवाचे आपणाकडे I
किती घ्यावे किती न्यावे I भोगावे कोण ते किती II
दाता अनंत भुजांचा I भडसा पुरवितसे I
पुरे पुरे पुरे आता I देव देता विटे चि ना II
भक्त तो घेईना काही I देवे त्रिलोक्य दिधले I
सर्व ही सांडिले दोघी I येकमेकासी लाविती II " ( स्फुट प्रकरणे )

ही समर्थांची प्रत्ययाची , धीराची व विश्वासाची वाणी त्या दयाळू , कोदंडधारी श्रीरामाच्या कोमल हृदयाचे ' भक्त उद्धाराचे ' ब्रीदच आपल्याला सांगून जाते.

Prof. Limaye said...

श्लोक ३५
गीता (४-११) श्लोकामध्ये "जो मला जसे भजतो मीही त्याना तसेच भजतो" असे भगवंत सांगतात आणि व्यवहारात ही आपण तसेच वागत असतो.कोणाला किती अंतरावर ठेवायचे हे त्या माणसाने आपल्याशी कसे आचरण केले यावर ठरवत असतो.या वेळी संत तुकडोजी महाराजांचा अभंग आठवतो,
" मनी नाही भाव I आणि देवा मला पाव II
देव अशाने पावायचा नाही I देव बाजाराचा भाजीपाला नाही II "
माणूस देवधर्म पूजापाठ वगैरे करतो ते स्वत:साठी, ईश्वरासाठी तर नाहीच नाही.तुम्ही पूजापाठ,व्रतवैकल्ये करा न करा देवाचे बिघडत नाही.फक्त माणसानी ही गोष्ट ध्यानात घ्यावी.प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या हृदयात असलेला परमेश्वर तशी करण्यास प्रवृत्त करतो. आपल्यावर संकट आले तर ते परमेश्वर कृपेनेच आले असे म्हणून आपण स्वस्थ राहिले पाहिजे . काही कारणाने आपले विमान चुकले तर किती वैताग होतो चरफडत घरी येतो तेंव्हा टिव्ही लावला आणि त्यावर बातमी आली की आपण ज्या विमानाने जाणार होतो तेच कोसळले तर आपण म्हणतो दैव बलवत्तर म्हणून वाचलो. खरतर मी वाचावे अशी परमेश्वराची इच्छा होती म्हणून माझे विमान चुकले,येथून खरी साधकावस्थेची सुरवात व्हायला हवी.परमेश्वराला (समर्थांचा परमेश्वर म्हणजे राम) अनन्य भावाने शरण जावे. तान्हे लेकरु सर्वस्वी आईवर अवलंबून असते , त्यामुले आई ही त्या लेकराचे सर्व काही आनंदाने करते त्यात तिला कष्ट पडत असले तरी तिला ते कष्ट वाटत नाहीत. तसेच मला प्रिय,माझे सर्वस्व म्हणजे परमेश्वर ,दुसरे कोणीही नाही अशी दृढ़ श्रद्धा असली की आपले काम झाले.आता आपली काळजी त्या रामाला इतकी की एका थोर संताने म्हटले आहे की रामाचा जप आम्ही नाही करणार कारण " राम हमारा जप करे I हम बैठे आराम II "